स्वामी श्रीसमर्थ रामदास यांच्या जन्मोत्सव चतु:शताब्दीनिमित्त प्रबोधन गोरेगाव आणि समर्थ उत्सव समितीने ’समर्थ उत्सवा’ चे दिनांक १४ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २००७ या कालावधीत प्रबोधन क्रीडाभवन, गोरेगाव (पश्चिम) येथे आयोजन केले होते. संत रामदासांनी मनाला वळण लावण्यासाठी सतत मनोबोधाची कास धरली होती. त्यांचे ’मनाचे श्लोक’ वाचले की, या संस्कारांच महत्व कळतं. संस्कारांमुळे मनातील अमंगळ विचार दूर जातात. म्हणून संस्कार हा शुद्ध आचारांचा पाया आहे. श्री समर्थांचे जीवन व कार्य दर्शविणारे भव्य प्रदर्शन, व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम इ. आयोजित करतानाच लहान मुलांना मार्गदर्शक ठरेल अशी संस्कार विषयक एक छोटेखानी पुस्तिका प्रबोधन गोरेगावने प्रकाशित केली.
या पुस्तिकेत मुलांचे संगोपन व जोपासना कशी करावी, त्यांच्यावर कसे आणि कोणते संस्कार करावेत या बद्दलची तसेच अन्य उपयुक्त माहिती देण्यात आली आहे.
समर्थ रामदास स्वामींचे चरित्र जर आपण पाहिले तर असं दिसून येईल की, अगदी लहान वयातच ते मुलांमधील गुणवत्ता ओळखत असत. मोठ्या माणसांपेक्षा लहान मुले संस्कार लवकर आत्मसात करतात याची समर्थांना जाणीव होती. त्या़चे शिष्य उद्धव , कल्याण इत्यादींना त्यांनी लहानपणापासूनच जवळ केलं होतं. पुढे या शिष्यांनी अध्यात्मात खूप मोठा पल्ला गाठला. समर्थांच्या छायेत राहूनही स्वत:चा ठसा तत्कालिन जनमानसावर उमटवला. लहानपणापासूनच समर्थांचे संस्कार शिष्यांवर झाल्यामुळे अन्य कोणत्याही सत्पुरुषांच्या शिष्यांपेक्षा समर्थांचा शिष्य संप्रदाय खूप मोठा आहे.
उत्तम शिष्य घडविण्याचं समर्थांच हे सामर्थ्य लक्षात घेऊनच समर्थांच्या अलौकिक कार्याची ओळख संस्कारक्षम वयातच मुलांना व्हावी म्हणून त्यांचे चरित्र तसेच कथा, लेख या छोटेखानी पुस्तकात समाविष्ट केले आहेत.
शालेय जीवनात मुले ’मनाचे श्लोक’ शिकत असली तरी समर्थांचे चरित्र व कार्य त्यांना फारसं माहित नसतं. या पुस्तिकेतील त्यांच्या विषयीचे साहित्य वाचून त्यांना समर्थांची ओळख चांगल्याप्रकारे होईल.
विद्यार्थीदशेपासूनच सज्जनगडावर जाऊन मिळेल ती सेवा करणार्या आणि पुढे जवळ-जवळ चाळीस वर्षे समर्थांच्या विचारांचा हिंदुस्थानभर प्रचार करून त्यांचे कार्य पुढे नेण्याचे काम करणार्या भगवान श्रीधरस्वामींचे अल्पचरित्र सुद्धा या पुस्तकात दिलेले आहे.
हे पुस्तक तयार करतांना आम्ही संस्कारविषयक तसेच समर्थ रामदासस्वामी यांच्यावरील अनेक पुस्तकांचा आधार घेतला आहे व त्यातील बहुमोल विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याचा आमच्या परीने प्रयत्न केलेला आहे. या पुस्तकाच्या लेखकांचे तसेच श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांचे आम्ही आभारी आहोत. संपादकद्वय प्रभाकर भोगले व वसंत तावडे यांनी हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी उत्सव समितीला जी मोलाची मदत केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद!
आजकाल विभक्त कुटुंब पद्धतीत मुलांवर संस्कार करायला वडीलधारी माणसं घरात नसतात. आईवडील नोकरी करीत असल्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नसतो. अशावेळी त्यांनी जर हे पुस्तक वाचलं तर त्याचा नक्की फायदा होईल अशी आम्हाला खात्री आहे. |