|
 |
ज्ञानामुळे माणूस घडतो. ज्ञानामुळे घडलेला माणूस समाज घडवितो. माणसं घडविणारे, माणसांच्या विचारांना - बुद्धीला चालना देणारे कार्यक्रम, उपक्रम श्री. सुभाष देसाई प्रबोधन गोरेगावच्या माध्यमातून अगदी पहिल्यापासून राबवित आहेत. गिरगाव, दादर, पार्ल्याच्या नागरिकांप्रमाणेच गोरेगावकरांनाही थोरामोठ्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळावी या आग्रहातून श्री. सुभाष देसाई यांनी ’प्रबोधन व्याख्यानमाला’ सुरु केली. सतत अकरा वर्षे या व्याख्यानमालेत महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील ज्ञानी, विद्वानांनी उपस्थिती लावली. नवीन विचार देणार्या या व्याख्यानमालेला सुज्ञ गोरेगावकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला. पूढे दूरदर्शनने लोकांना घराच्या चार भिंतीत जखडून टाकलं आणि ’चार माणसांसमोर वक्त्यांना बोलायला लावण्यात अर्थ नाही’, असा विचार करुन ’प्रबोधन व्याख्यानमाला’ थांबविण्यात आली. मात्र माणसांची ज्ञानार्जनाची भूक थांबणारी नाही. थोरांचे विचार, मोठ्यांची कामं याबद्दल जाणून घ्यायचं हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव. गोरेगावकरांची ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी श्री. सुभाष देसाई यांनी २००० साली ८ जानेवारीला प्रबोधन व्यासपीठाची सुरुवात केली. या उपक्रमास रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. प्रत्येक मान्यवराच्या व्याख्यानाच्या शेवटी रसिकांनी उत्स्फूर्तपणे प्रश्नोत्तरे करुन प्रत्येक व्याख्यानास वेगळीच रंगत आणली.
गत ८-९ वर्षांत समाज जीवनात वेगवेगळ्या प्रांतात काम करणार्या कितीतरी व्यक्तींनी प्रबोधनच्या व्यासपीठावर आपली उपस्थिती लावून सदर व्यासपीठ अधिकाधिक समृद्ध केले आहे. या कार्यक्रमांना रसिक श्रोत्यांची उपस्थिती नेहमीच उत्तम राहिली आहे. सदर उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रांतील नामवंत, तज्ज्ञ मंडळींची व्याख्याने आयोजित करुन श्री. सुभाष देसाई यांनी सामाजिक कार्यातील एक आदर्श घालून दिला आहे अशीच समस्त उपस्थित श्रोतृवर्गाची भावना असते. व्याख्याते व विषय यांची निवड करण्यासाठी, तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देखील श्री. देसाई कायम सजग असतात. ज्ञानदानाच्या मार्गातील सुभाष देसाई यांचा ’प्रबोधन व्यासपीठ’ उपक्रम सातत्याने रसिक श्रोत्यांना असेच दर्जेदार बोधामृत देत राहील हा विश्वास गोरेगावकरांना आहे. |
|