|
|
शिवसेनेची उमेदवारी देतानाच माननीय शिवसेनाप्रमुख स्पष्टपणे बजावितात - ’जनसेवा करायची असेल तरच निवडणूक लढवा!’ मी सुद्धा याला अपवाद नव्हतो. म्हणूनच निवडून आल्या दिवसापासून गोरेगावातील काना-कोपऱ्यापर्यंत पोहोचलो. जनतेच्या गरजा, मागण्या आणि आवडी निवडी पाहून विकासकामे राबविली. झोपडपट्ट्या, जुन्या चाळी, इमारती - कशालाही वगळले नाही.
नागरिकांना उघड्यावर शौचाला जावे लागू नये म्हणून शौचकूप बांधणीवर विशेष भर दिला. आणि हजारावर नवीन शौचकूप बांधून घेतले. तितकेच मोडलेले दुरुस्त करुन घेतले. निर्मल गोरेगावच्या दिशेने हे महत्वाचे काम झाले.
बालवाड्या, समाजमंदिरे, सभामंडप आणि व्यासपिठे बांधून देतानाच जुन्या गळक्या जलवहिन्या बदलण्यावर आणि कूपनलिक खोदण्यावरही भर दिला. परिसर काँक्रिटचे, पेव्हरब्लॉकचे करण्याकडेही लक्ष दिले. युवा व तरुण पिढीसाठी मैदानांची सुधारणा, खेळसाहित्याचे वाटप, लहान मुलांसाठी झोपाळे - खेळणी व क्रिकेट - कॅरमच्या वाटपामुळे अनेकांना आनंद झाला. अतिक्रमणे हटविण्यासाठी काहीशा विलंबाने का होईना पण ब्रह्मचारी विश्वानाथजी उद्यान पुन्हा सुरु झालेल्याचा आनंद नागरिकांनी व्यक्त केला.
मीनाताई ठाकरे रक्तपेढीने ५ वर्षात तीस हजार रुग्णांना जीवदान दिले. प्लेटलेटसारखे घटक पुरविले. आता बालरुग्णांसाठी थॅलेसेमिया केंद्र सुरु झाले. बंद पडलेल्या निरलॉन तलावाच्या जागी सुरु केलेला ’ओझोन’ जलतरण तलाव मुंबईचा अव्वल तलाव ठरला. हजारोंचा लाडका झाला. जॉगर्स पार्कशेजारी प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाची टुमदार वास्तु उभी राहिली. तेथेच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, बुद्धिबळाचे व योगाचे वर्ग सुरु झाले. सर्वात जास्त समाधान देणारे कार्य उभे राहिले ते म्हणजे प्रबोधन औषधपेढीचे. कोणीही गोरेगावकर औषधाविना विव्हळू नये यासाठी हे केंद्र विकसित होत आहे.
ही विकासकामे एका बाजुने होत असताना दुसरीकडे शिवसेनेची आंदोलने सुरुच होती. त्यात ’सुरभि’ हटवून झालेले रस्ता रुंदीकरण गाजले. पण वीजदर विरोधातील आणि पूर्वेचा स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी साखळी आंदोलने सुरुच आहेत. सिद्धार्थ रुग्णालयात अतिदक्षता विभाग आणि सोनोलॉजी विभाग सुरु झाले त्यामागे शिवसेनेची निदर्शनेच आहेत. मागील पाच वर्षात सावरकर उत्सव, मुंबई फेस्टीवल, समर्थ उत्सव आणि ’जाणता राजा’ चे आयोजन असे भव्यदिव्य कार्यक्रम गोरेगावकरांनी याची देही याची डोळा अनुभवले. त्यामागे शिवसैनिकांचे कष्ट होते तसेच हे शिवसैनिक २००५ महापुराच्या वेळी मदत कार्यातही झटले, हे कोण विसरेल?
या सर्व कार्यामागे माननीय बाळासाहेबांचे आशीर्वाद, माननीय उद्धवजींचे मार्गदर्शन व मोलाची साथ, शिवसेना नेते, पदाधिकारी, महिला आघाडी, विद्यार्थी सेना, व्यापार विभाग या सर्वांचे भरीव सहकार्य मला सदैव लाभले. त्यांच्या ऋणातच राहाणे मला आवडेल.
पुढील काळात गोरेगावात आणखी तीन उड्डाणपूल, पादचारी पूल, दोन भव्या उद्याने, गुरांच्या बाजाराजवळ शासकीय कार्यालय संकुल व सभागृह, महापालिकेचे नाट्यगृह, विभाग कार्यालयाची नवीन वास्तु, टोपीवाला मंडईचे नूतनीकरण अशा काही योजना आकाराला येत असून त्यांची जोरदार पूर्वतयारी सुरु आहे. कचरामुक्त गोरेगाव हे स्वप्नही साकार होईल, मात्र त्यासाठी नागरिकांचे सहकार्य हवे!
आपल्या पाठिंब्यामुळे व चांगल्याला चांगले म्हणण्याच्या प्रवृत्तीमुळेच ही प्रगती होऊ शकली.
आपले आशीर्वाद शिवसेनेच्या मागे असेच कायम ठेवा आणि गेली वीस वर्षे गोरेगाववर फडकणारा भगवा पुन्हा डौलाने फडकवा हीच विनंती!
आपला नम्र

सुभाष देसाई
शिवसेना नेते व आमदार |
|